26 नोव्हेंबरच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने कोरडी, शाब्दिक सहानुभूती दाखवली. संयुक्त तपास करण्याची तयारी दर्शवली, मात्र आपल्या प्रत्येक शब्दापासून पाकिस्तान मागे फिरला आहे. चोर तो चोर व शिरजोर, असे पाकिस्तानचे सध्याचे वर्तन आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांची पत्नी बेनझीर भुट्टो याही दहशतवादाच्या बळी आहेत. त्यामुळे झरदारी यांच्याभोवती सहानुभूतीचे एक वलय आपोआप तयार होते. पत्नीच्या मृत्यूनंतर दहशतवादाबद्दल झरदारीच्या मनात घृणा निर्माण होण्याच्या ऐवजी सत्ता संपादन करण्यासाठी पत्नीच्या मृत्यूचे त्यांनी भांडवल केले असेच आता दिसत आहे. राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी नवाझ शरीफ यांनाही या खोटारडेपणावर भाष्य करावेसे वाटले. अर्थात शरीफ आता शरीफ होऊन भारतीयांच्या भावनेत शरीफ झाले असले तरी हा माणूसही अजिबात विश्वसनीय नाही. वाजपेयी यांच्याबरोबर आग्रा येथे मैत्रीच्या गप्पा मारताना कारगिलमध्ये घुसखोरी झाली याला मुशर्रफ जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच शरीफही जबाबदार आहेत. किंबहुना आयुबखानपासून याहयाखान, झुल्फीकार अली बेनझीर, झिया कोणालाही भारताबरोबर मैत्री असावी, अशी इच्छा नव्हती. विधवा बाईशी (इंदिराजी) बोलणार नाही, असे असभ्य उद्गार झुल्फीकार अली यांनी काढले होते तर भारताशी हजार वर्षे युद्धे करण्याची भाषा बेनझीरने काढली. हे झरदारी म्हणजे झुल्फीकार यांचे जावई व बेनझीरचे पती. भारताबरोबर युद्ध करण्याची धमक नाही हे तीनदा लक्षात आल्याने झरदारी युद्धाची भाषा करीत नाहीत, पण भारताने युद्ध लादले तर चोख प्रत्युत्तर देऊ असा उद्दामपणा दाखवायलाही ते कमी करत नाहीत. मुंबईतील हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे याचे अनेक पुरावे दिले, असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी म्हणतात. या पुराव्याच्या अनुषंगाने उचित कारवाई करण्यास पाकिस्तान टाळाटाळ करीत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करणे हाच एक मार्ग आहे. आमच्यापुढे सर्व पर्याय उपलब्ध आहेत, अशी संदिग्ध किंवा लेचीपेची भाषा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठीक होती, पण आता पाकिस्तानच्या आगळीकीला एक महिना होत आला. पाकिस्तानला आपल्या कृत्याची शरम वाटत आहे याचे एकही लक्षण नाही. उलट उर्मटपणा वाढत आहे. अशा वेळी इशारे खूप झाले. युद्ध सुरू करण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे?
प्रत्येक सच्चा भारतीय गेले 25 दिवस आपण पाकिस्तानवर केव्हा हल्ला करतो याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र संसदेत या विषयावर चर्चा झाली तेव्हा याच प्रणव मुखर्जी यांनी युद्धाची कल्पना धुडकावून युद्ध हा उपाय नाही, असे विधान केले. मग आत्ताच्या "सर्व पर्याय उपलब्ध आहेत' या विधानास कितपत गांभीर्याने घ्यायचे, असा प्रश्न निर्माण होतो. पाकिस्तानबरोबर युद्धाची सरकारला खरोखर इच्छा आहे का, असा प्रश्न कोणीही विचारेल. शनिवारी 20 डिसेंबरला साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बैठक झाली. या बैठकीमुळे युद्धाची पूर्वतयारी असा समज झाला. बैठक होऊन 48 तास उलटले तरी अद्याप काहीच न झाल्याने दिल्लीच्या मनात काय आहे तेच कळत नाही. पाकिस्तानवर हल्ला केल्यास त्याची जागतिक प्रतिक्रिया काय उमटेल याचा विचार करणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, दहशतवादाचे चटके बसलेला प्रत्येक देश भारताने आता कारवाई केली तर त्याचे समर्थनच करेल. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन या पाश्चिमात्य देशांप्रमाणे रशियालाही चेचन्य बंडखोरांमुळे खूप त्रास सोसावा लागला आहे. बालवाडीतील लहान मुलांपासून नाट्यगृहातील प्रेक्षकांपर्यंत अनेक निरपराध रशियनांची चेचन्य बंडखोरांनी हत्या केली आहे. हे चेचन्य बंडखोर म्हणजेही इस्लामपंथीय आहेत. दिल्लीप्रमाणे न्यूयॉर्क, मास्को, लंडन, माद्रिद येथील हल्ल्यामागेही इस्लामपंथीयच असल्याने या कारवाईला कोणी विरोध करणार नाही. जागतिक प्रतिक्रियेची भीती बाळगणे म्हणजे साप म्हणून दोरी धोपटण्याचा प्रकार आहे. या कारवाईला काही अरबी देशांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यातही तालीबानी प्रवृत्तींचा उपद्रव सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त या देशांना झाल्याने त्यांनी या पूर्वीच इस्लामी दहशतवादाविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. या युद्धामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होणे शक्य आहे. नागरिक त्यालाही तयार आहेत. यापूर्वी शास्त्रींनी भात सोमवारी खाऊ नका, असे आवाहन केले होते तर दक्षिण भारतातूनही त्याला प्रतिसाद मिळाला होता. पाकिस्तानला कायमची अद्दल घडणार असेल तर मोटारवाले स्कूटरवर आणि स्कूटरवाले सायकलीवर बसायला आनंदाने तयार होतील. युद्धामुळे महागाई वाढली तरी पाकिस्तानचे निर्दालन होणार असेल तर त्यालाही नागरिक तयार आहेत. सारे राष्ट्र पश्चिम सीमेवर कारवाई केव्हा सुरू होते याची आतुरतेने वाट पाहत आहे. पूर्व पाकिस्तानविरुद्ध कारवाई करून इंदिरा गांधींनी लोकसभेच्या निवडणुका घेतल्या आणि दोन तृतीयांश एवढे प्रचंड बहुमत मिळवले. पश्चिम पाकिस्तानवर कारवाई केल्याने निवडणुकीत नुकसान होईल, असे इंदिराजींच्या वारसांना का वाटते. उलट अनेक विचारी मुस्लिमांची सध्या कुचंबणा होत आहे. मुस्लिम म्हणताच इतरांच्या चेहऱ्यात, बोलण्यात पडणारा फरक त्यांना अस्वस्थ करीत आहे. पाकिस्तानला एकदा कायमचे संपवून टाका म्हणजे आमच्यावरील किटाळ तरी दूर होईल, असे त्यांना वाटते. पाकिस्तानला चिरडून टाका अशी आता समस्त भारतीयांची तीव्र इच्छा असताना सरकार कशाची वाट पाहत आहे?
वाचलेच पाहिजे असे
Monday, December 22, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
....
मी एक पत्रकार आहे. आज प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायीक बनली आहेत; आणि पत्रकारही. परिणामी या राष्ट्रासमोरील समस्या यथार्थपणे समाजासमोर आणल्या जात नाहीत. भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व.
स्वामी विवेकानंद म्हणतात हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हे एक कटु सत्य आहे.
विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, "जीवनात आव्हानांचे भारी महत्व असते. जीवनात आव्हाने नसतील तर मनुष्य निष्क्रीय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परन्तु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील तर पुढील दोन पैकी एक गोष्ट होऊ शकते...
i. आव्हाने समजुन घेतली नाही तर त्या आव्हानान्ना बळी पडून नष्ट व्हावे लागते.
किंवा
ii. आव्हाने समजुन घेवून त्यांना प्रतिसाद दिला तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''
जी गोष्ट मनुष्याला लागु पड़ते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागु पड़ते.
या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरु आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे. हिन्दुन्मधे न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न तथाकथित धर्मनिरपेक्षवादी (दुर्) बुद्धिवादी करीत आहेत. त्यामुले या समाजासमोरिल आणि राष्ट्रासमोरील आव्हनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.
...... सिद्धाराम भै. पाटील
No comments:
Post a Comment