देशावर झालेल्या हल्ल्याबाबत हे निकम्मे सरकार जशी धूळफेक करीत आहे तशीच 22 जुलैच्या लोकशाहीवरील हल्ल्याबाबत सत्यशोधन न करता पुन्हा धूळफेक करून प्रकरण दाबले आहे। खासदारांना लाच देण्याचा जो प्रकार झाला त्याच्या चौकशीस 5 महिने का लागावेत? समितीचे अध्यक्ष किशोरचंद्र देव हे कॉंग्रेसचे खासदार व माजी मंत्री. कॉंग्रेस पक्षावरील सोनिया गांधी यांची पकड लक्षात घेता त्यांचे चिटणीस अहमद पटेल यांना दोषी म्हणण्याची हिंमत किशोरचंद्र यांच्याकडे नव्हती, तसेच झाले. व्ही. जॉर्ज यांच्याप्रमाणेच लफड्यात अडकवलेल्या पटेलना सोडायचे म्हणून अमरसिंह यांना सोडले. शिवाय त्यांचा समाजवादी पक्ष सध्या कॉंग्रेसचा दोस्त आहे. दोस्ताला कसे दुखवायचे? असा हा राजकीय सोयीने बनवलेला अहवाल आहे. गोध्रा प्रकरणानंतर लालूंनी नेमलेल्या बॅनर्जी आयोगाने जसा लालूंना हवा तसा अहवाल दिला तसाच किशोरचंद्र यांनी सोनिया गांधी यांना हवा तस्सा अहवाल दिला आहे. 5 महिने आणि 600 पाने ही निव्वळ धूळफेक आहे. भाजपाचे विजयकुमार मल्होत्रा आणि मार्क्सवादी मोहमंद सलीम यांनी वेगळी मतपत्रिका जोडली, ती प्रसिद्ध झाली पाहिजे. 26 नोव्हेंबरचा मुंबईतील हल्ला आणि 22 जुलैचा लोकशाहीवर हल्ला या दोन्ही प्रकरणी सरकारने झकास धूळफेक केली आहे.22 जुलैच्या प्रकारासंदर्भात पत्रकार राजदीप सरदेसाई यांची भूमिकाही संशयास्पद आहे. 22 जुलैच्या पैसे व्यवहाराचे गुप्त चित्रण करून ते प्रक्षेपित करण्याचे त्यांनी मान्य केले होते. मग ऐनवेळी त्यांनी माघार घेणे, संपूर्ण चित्रण असलेली कॅसेट भाजपा खासदारांना देण्यास नकार देणे ही सरदेसाई यांची कृती पत्रकारितेस लांछन आणि हा निंद्य प्रकार दडपण्यास सहाय्यभूत ठरली आहे. सत्ता नसताना सोनिया गांधीचे सचिव व्ही. जॉर्ज यांचे गैरप्रकार उजेडात येऊन त्यांची हकालपट्टी होते आणि सत्ता आल्यावर अहमद पटेल निष्कलंक ठरतात आणि या पापास पत्रकार हातभार लावतात, हे दुर्दैव आहे.
अग्रलेख, १७ दिसम्बर २००८ , सोलापुर तरुण भारत.
No comments:
Post a Comment